Saturday, July 24, 2010

डॉ.गिरीश जाखोटीया - व्यवसाय सल्लागार, चतुरस्र लेखक व वक्ता


श्री. सुरेश निमकर - वक्त्याचा परिचय करून देताना



डॉ. गिरीश जाखोटीया हे नावं ऐकल्याबरोबर एक चतुरस्त्र व्यक्तिमत्व डोळ्यासमोर येते. ‘एका मारवाड्याची गोष्ट’, ‘वंश’ या गाजलेल्या कादंबर्‍यांचे लेखक डॉ.गिरीश जाखोटीया यांचे भाषण ऐकण्याचा अपूर्व योग दि. १४ जुलै २०१० च्या साप्ताहिक सभेत सोबती सभासदाना आला.
सोबतीचे उपाध्यक्ष श्री. सुरेश निमकर यांनी डॉ. जाखोटिया यांचा विस्तृत परिचर करून दिला व मग डॉ. जाखोटिया यांनी प्रसन्न मुद्रेने आपल्या भाषणास सुरवात केली. ओघवती भाषा, नर्मविनोदांची पखरण, विषयाचे सखोल ज्ञान व चिंतन यामुळे ‘वक्ता दशसहस्रेषु’ या सुभाषिताचा प्रत्यय आला. आपल्या भाषणात त्यानी अनेक विषयांचा परामर्ष घेतला.

लिखाणासंबंधी ते म्हणाले की ज्येष्ठानी आपल्या अनुभवांवर आधारित लिखाण करावे ज्यामुळे त्या लिखाणाला अधिक विश्वासार्हता येईल.
व्यवसाय करणार्‍यानी कुटुंबामध्ये समन्वय साधायला हवा. कुटुंबामध्ये जर चांगला समन्वय असेल तर व्यवसायामध्येही त्याचे प्रतिबिंब पडते. अहंकार हा व्यवसायाचा मोठा शत्रू आहे. अहंकार बाजूला ठेवून जर व्यवसाय केला तर संघर्षाचे प्रश्न उद्भवणार नाहीत. संघर्षाकडे चौफेर व सकारात्मक वृत्तीने पाहिजे तरच संघर्षातून संवाद निर्माण होईल.
मराठी मुले व्यवसायात मागे आहेत. परंतु आता परिस्थिती बदलत आहे.नवीन पिढी आता व्यवसायाकडे आकर्षित होत आहेत व यशस्वीही होत आहे. मात्र त्यानी अधिक धाडशी व्हायला हवे. प्रसंग येता ज्याप्रमाणे परशुरामाने शस्त्र हाती धरले तसे इतर गोष्टींचा बाउ न करता मराठी मुलानी धाडसाने पावले टाकली पाहिजेत. व्यवसाय म्हटला की त्यातल्या युक्त्या व खुब्या आत्मसात करायला हव्यात. तरच ते इतरांशी स्पर्धा करून व्यवसायात यशस्वी होतील.
व्यवसाय म्हटला की त्यामध्ये अनेक माणसांचा सहयोग आवश्यक असतो. त्यासाठी एक नेटवर्क बनविणे आवश्यक असते ज्यायोगे परस्पर देवाण घेवाण सुलभ होते. शिवाय व्यावसायिकांमध्ये बेरकीपणा, अर्थात सकारात्मक, यायला हवा. व्यवसायात अहंकार, अस्मितेचा विचार बाजूला ठेवायला हवा. नीतीच्या घट्ट चौकटीमध्ये बसून चलणार नाही. लवचिकता, व्यवहार या गोष्टी महत्वाच्या आहेत. अप्रामाणिकपणा न करताही व्यावसायिकता अंगी बाणवली तर यश मिळू शकते.आज भाषा, संस्कृति यांची अस्मिता राखण्याची चर्चा होते. पण विश्वाला कवेत घ्यायचे असेल तर अस्मितेच्या मर्यादेत फारसे काही करता येणार नाही.
बाह्य मन व अंतर्मन याचा विचारही आवश्यक आहे. बाह्य मन कोणत्याही बाबतीत चटकन प्रतिक्रिया देते. पण अंतर्मन मजबूत असेल तर मनाला योग्य मार्गदर्शन मिळू शकते.
डॉ. जाखोटीया यानी कृष्णनीती्वर विशेष भर दिला.कृष्ण आवश्यक तेथे प्रेमाने वागत असे, प्रसंगी व्यावहारिक नीतीचा अवलंब करीत असे तर प्रसंगी कर्तव्यकठोरही होत असे. म्हणून तो महान पदाला पोहोचला. अशा कृष्णनीतीची आज आवश्यकता आहे. देवाच्या बाह्य दर्शनापेक्षा देवाला अंतर्मनामध्ये पाहिला तर जीवनात समाधान मिळते. त्यांच्या मते व्यवसायातील मानसिकता अंगी बाणणे आवश्यक आहे. ती असेल तर व्यवसायात यश निश्चित असते.
डॉ. जाखोटिया मूळचे राजस्थानी (त्यांच्या भाषेत मारवाडी) असले तरी त्यांच्या चार पिढ्या महाराष्ट्रात गेल्याने व त्यांची पत्नी मराठी असल्याने मराठी मानसिकता, मराठी भाषा व संस्कृति यांच्याशी ते पूर्णपणे एकरूप झाले आहेत. याचे प्रतिबिंब त्यानी
लिहिलेल्या पुस्तकांत पडले आहे. त्यांच्या ‘एका मारवाड्याची गोष्ट’ या कादंबरीच्या अनेक आवृत्त्या अल्प काळामध्ये निघाल्या ही त्यांच्या लेखनशैलीची पावतीच म्हणावी लागेल. त्यांची ‘वंश’ ही कादंबरीही अशीच लोकप्रिय झाली आहे. अनेक प्रतिथयश कंपन्यांचे व्यग्र आणि यशस्वी व्यवसाय सल्लागा्र असूनही त्यानी लेखनाचा व्यासंगही जोपासला आहे व त्याना लेखक व वक्ता म्हणून मिळालेली लोकप्रियता स्पृहणीय आहे.
त्यांच्या भाषणाचे वैशिश्ट्य म्हणजे ते ज्या ‘मारवाडी’ समाजाचे आहेत त्या समाजावर आधारित विनोदही करतात. त्यांचे भाषण क्षणभरही कंटाळवाणे वाटत नाही. ते केवळ व्यवसायाबद्दल बोलत नाहीत तर मानवी प्रवृत्ती, आशा आकांक्षा , प्रत्येक समाजाची वैशिष्ट्ये व वैगुण्य यांचाही उहापोह ते भाषणात करतात.
त्यांच्या आणखी दोन कादंबर्‍या - एक मराठी व एक इंग्रजी येउ घातल्या आहेत व त्याही लोकप्रिय होतील यात शंका नाही.
जागतिक मंदी असूनही भारतावर तिचा फारसा परिणाम झाला नाही याचे कारण काय असा प्रश्न विचारला असतां त्यांच्या मते भारतीयांमध्ये असलेली बचतीची सवय व अमेरिकन लोकांच्या तुलनेत आपण फार कमी चंगळवादी व खर्चिक आहोत हे आहे.

Tuesday, July 20, 2010

सोबतीचा वर्धापन दिन सोहळा










दर वर्षीप्रमाणे सोबतीचा ३१वा वर्धापन दिन समारंभ दिनांक १० जून २०१० रोजी उत्साहात साजरा झाला. या सोहळ्याचा प्रथम भाग या आधी दिनांक २ जून रोजी संपन्न झाला होता.

सुरुवातीला प्रार्थना व सोबतीचे शीर्षक गीत सोबतीच्या सभासदानी संगीताच्या साथीने सादर केले.

सोबतीचे अध्यक्ष श्री. मुकुंद पेठे यानी समारंभाचे प्रमुख पाहुणे पार्ल्याचे सुपरिचित रहिवासी ऍड्व्होकेट पराग अळवणी यांचा परिचय करुन दिला व यांच्या राजकीय व सामाजिक कार्याची माहिती करुन दिली.

कार्यवाह श्रीमती शीला निमकर यानी गेल्या वर्षातील सोबतीच्या घडामोडींचा आढावा घेतला व सोबतीचे अनेक उपक्रम यांची माहिती दिली. त्यानंतर सोबतीच्या ज्येष्ठ नागरिकांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार हा महत्वाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

ज्या सभासदाना सहस्रचंद्रदर्शनाचा लाभ झाला, ज्यानी वयाची पंचाहत्तर वर्षे पूर्ण केली व ज्यांच्या विवाहाला पन्नास वर्षे पूर्ण झाली अशांचा गुलाब पुष्प, श्रीफळ व भेटवस्तु देउन प्रमुख पाहुणे श्री. पराग अळवणी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभानिमित्त श्री. र.पां. मेढेकर व श्री. शंकर लिमये यानी आपले विचार व्यक्त केले.

त्यानंतर प्रमुख पाहुणे श्री. पराग अळवणी यांचे भाषण झाले.

ज्येष्ठांचा सत्कार करण्याची संधी दिल्याबद्दल त्यानी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले ‘शिक्षण, नोकरीधंदा, संसार यातून माणूस निवृत्त होतो व नंतर त्याच्या आयुष्याच्या ‘सेकड इनिंग’ची सुरुवात होते. आरोग्य, विरंगुळा, आर्थिक नियोजन अशा गोष्टीना त्याला सामोरे जावे लागते.जर सेवानिवृत्तीपूर्वी या गोष्टींचे नियोजन केले तर ‘सेकंड इनिंग’ मधील उर्वरित आयुष्य समाधानाचे जाते.’

‘सोबतीची कार्यालयीन जागा नाही व त्यासाठीचे सोबतीचे प्रयत्न अपुरे पडले. परंतु ज्येष्ठ नागरिकांनी शासन व महानगरपालिका यांच्याशी सतत संपर्कात राहून, पाठपुरावा केल्यास ही समस्या सोडविता येणे शक्य आहे. सोबतीच्या यासाठीच्या प्रयत्नात योग्य ते सहकार्य व मार्गदर्शन मी देईन’ असे त्यानी आग्रहाने सांगितले.

त्यानंतर सोबतीचे ज्येष्ठ सभासद प्रा. येवलेकर यांच्या हस्ते भाग्यशाली सोडत काढण्यात आली व तीन यशस्वी क्रमांकाना बक्षिसे देण्यात आली.

सोबतीचे कार्याध्यक्ष श्री. विश्वास डोंगरे यानी प्रमुख पाहुणे, कार्यकारिणीचे पदाधिकारी, अनेक ज्येष्ठ नागरिक, लोकमान्य सेवा संघ व ज्यानी हा समारंभ यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले त्या सर्वांचे मन:पूर्वक आभार मानले.

शेवटी चविष्ट उपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.

सोबतीचा ३१वा वर्धापन दिन

दर वर्षीप्रमाणे सोबतीचा ३१वा वर्धापन दिन दिनांक २ जून व १०जून रोजी साजरा झाला.

दिनांक २ जून रोजी कॅन्सरपीडीतांसाठी तन मन धनाने कार्य करणारे श्री. गोपाळ केशव तथा काका जोगळेकर व त्यांचे सहकारी यांच्या प्रयत्नांतून साकारलेल्या वाद्यवृंदाचा कार्यक्रम आयोजित केला होता. काका जोगळेकर यांची कहाणी म्हणजे निर्धार, मनोबल व सामाजिक जाणीव याचे मूर्तीमंत उदाहरण. या निमित्ताने त्यांचा परिचय करुन देणे उचित ठरेल.

कॅन्सर या रोगाच्या नावाचा उच्चारही माणसाला भीतीदायक वाटतो. पण काका जोगळेकरानी कॅन्सरला धैर्याने तोंड दिले. इतकेच नवे तर त्याच्याशी झगडून त्यानी कॅन्सरला दूर केले. एवढ्य़ावरच न थांबता कॅन्सरपीडीतानी आनंदी जीवन कसे जगावे याचा आदर्श घालून दिलाच पण अनेक कॅन्सरपीडीताना मानसिक व प्रसंगी आर्थिक आधारही दिला व त्याचा फायदा अनेक कॅन्सरपीडीताना होत आहे.

काकानी दोन ठिकाणी नोकरी केली. गायन वादनाचे क्लासही घेतले. दुर्दैवानॆ त्याना रेक्टमचा कॅन्सर झाल्याचे निदान झाले आणि टाटा हॉस्पिटलमध्ये त्यांच्या वर शस्त्रक्रियाही झाली. २८ वेळा रेडीएशन व २४ वेळा केमो थेरापीची ट्रिट्मेंट घेतली. मनोबल व निग्रह यांच्या आधाराने अखेर त्यानी कॅन्सरवर विजय मिळविला.

या अनुभवातून कॅन्सरपीडीताना मानसिक आणि यथाशक्ति आर्थिक आधार देणे हेच त्यांच्या उर्वरित आयुष्याचे ध्येय ठरले व त्यानुसार त्यांची वाटचाल चालू आहे. त्यांच्या या धीरोदात व समाजसेवी वृत्तीमुळे त्याना अनेक सेवाभावी कार्यकर्ते मिळाले व त्यांच्या मिशनला त्यांचा हातभार लागला. गायन, वादन हा त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला. अत्यंत अल्प फीमध्ये ते मतिमंद व शारीरिक व्यंग असलेल्या मुलाना ते गायन, वादन शिकवू लागले.

१५ ऑगस्ट २०० रोजी त्यानी ` We Can Give' हा वाद्यवृंद स्थापन केला. १५ दिवसांतून एकदा टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये पेशंटसाठी भजन आणि सुगम संगीताचा कार्यक्रम सादर करतात. असे कार्यक्रम त्यानी अनेक संस्थांमध्ये सादर केले आहेत.

काही महिन्यांपूर्वी ‘Crusade Against Cancer' या कार्यक्रमात अमिताभ बच्चन यांच्या हस्ते काकांचा सत्कार झाला व ‘Times of India' मध्ये त्यांची मुलाखतही प्रसिद्ध झाली.

काकांचा हा अतुलनीय सेवाभाव पाहून सोबतीने त्यांच्या वाद्यवृंदाचा कार्यक्रम ठेवला. त्यात अनेक गाणी सादर झाली. एक अपंग व अंध मुलगी हिने अनेक बहारदार गाणी सादर केली. त्याबद्दल सर्वानी तिचे कौतुक केले. सोबतीचे एक ज्येष्ठ सभासद श्री. र.पां मेढेकर यानी उत्स्फूरर्तपणे सदर अंध व अपंग मुलीला रुपये एक हजार बक्षीस दिले. विशेष म्हणजे काकांच्या काही सहकारी ज्येष्ठ नागरिकानीही गाणी सादर केली.

काकांच्या या सेवाभावी कार्याला यथाशक्ती हातभार लागावा या भावनेने अनेक सोबती सभासदानी काकांच्या संस्थेला उत्स्फूर्तपणे देणग्या दिल्या व एकूण वीस हजारांची भरघोस देणगी सोबती सभासदांतर्फे त्याना देण्यात आली. काकांच्या या सामाजिक उपक्रमाला सोबती सभासदांचा मिळालेला प्रतिसाद कौतुकास्पद आहे.

Friday, July 16, 2010

नवी दिल्ली येथील नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ

नवी दिल्ली येथे नवीन ’इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ’ काही दिवसांपूर्वी चालू झाला. त्याच्या निरनिराळ्या विभागांचे हे वापर सुरू होण्यापूर्वीचे फोटो माझेकडे Internet वरून आले. फोटो पाहून हा विमानतळ खरेच आंतरराष्ट्रीय दर्जाचा झाला आहे अशी खात्री पटेल. (फोटोवर क्लिक केले तर फोटो मोठा व जास्त चांगला दिसेल.)































Friday, July 09, 2010

सरोगसी - २

’सोबती’त या विषयावर श्री. सुरेश निमकर यांचे उद्बोधक असे व्याख्यान झाले त्याबद्दल माहिती प्रकाशित केलेली आहेच. या योजलेल्या व्याख्यानाच्या निमित्ताने या विषयावर मीहि काही माहिती गोळा केली होती. व्याख्यानात व नंतरच्या माझ्या छोट्या भाषणात यांतील बर्‍याच गोष्टींचा उहापोह झालाच. त्याचाच पुढील भाग म्हणून हा लेख आहे.
सध्यातरी भारतात सरोगसीसंदर्भात कोणताही स्वतंत्र कायदा नाही. मात्र सरोगसी बेकायदेशीरहि ठरवलेली नाही. लॉ कमिशनने एक रिपोर्ट तयार केला आहे आणि त्या अनुषंगाने एक नवीन कायदा येऊं घातला आहे. त्याविषयीं मला खालील गोष्टी व्हाव्यात असे वाटते.
१. सरोगसी करार. - या करारामध्ये सरोगेट माता, ’इच्छुक’ माता-पिता व क्लिनिक/डॉक्टर यांची नावे यावीं, म्हणजेच त्रिपक्षीय करार असावा. करार रजिस्टर करणे बंधनकारक असावे. इच्छुक माता वा पिता (अविवाहित, घटस्फोटित वा विधवा-विधुर) एकटेच असतील तर तसा स्पष्ट उल्लेख असावा. ’गे’ किंवा ’लेस्बियन’ कुटुंब वगैरे प्रकार असल्यास तेहि स्पष्ट केलेले असावे. करारानंतर, पण बालकाच्या जन्माआधी, ’इच्छुक’ जोडपे घटस्फोटित झाल्यास बालकाचा ताबा दोघांपैकी कोण घेणार तसेच दुर्दैवाने दोघांचाहि मृत्यु झाल्यास बालकजन्मापर्यंत उरलेल्या खर्चाची व जन्मानंतर पुढे बालकाची सर्व जबाबदारी कोण घेणार याचाहि उल्लेख करारात हवा. ती जबाबदारी कोणत्याहि परिस्थितीत सरोगेट मातेवर वा शासनावर पडूं नये. त्या व्यक्तीने जबाबदारी स्वीकारल्याचेहि करारात नमूद व्हावे. इच्छुक जोडपे भारतीय नसल्यास बॅंक गॅरंटीचीहि तरतूद त्यासाठी असावी.
सरोगसीची कल्पना ’टोकाची’ असल्यास, (म्हणजे सरोगेट माता, व ’इच्छुक’ माता-पिता तिन्हीहि, जन्माला येणार्‍या बालकाचीं ’जनक-जननी’ नसून दुसरींच दोन निनावी, अज्ञात, स्त्री-पुरुष ’जनक-जननी’ असणे.) ते कायद्याला मान्य असेल काय? असण्यास हरकत नाही मात्र ही गोष्ट करारात स्पष्ट झालेली असावी.
’इच्छुक’ माता-पिता व सरोगेट माता या तिघांचेहि DNA रेकॉर्ड कराराचा भाग असावे. (अपत्याचे DNA सरोगेट मातेशी जुळूं नये, मात्र ’इच्छुक’ माता व / वा पिता ’जनक / जननी’ असल्यास त्यांच्याशी जुळावयास हवे. कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीला वा तक्रारीला जागा राहूं नये हा हेतु.)
२. जन्मदाखला. - मातेचे व पित्याचे नाव नेहमींच्या दाखल्यात लिहिलेले असते. मात्र जन्म सरोगसीने झाला असल्यास, नेहेमीपेक्षा वेगळा दाखला दिला जावा. जन्मदात्या मातेचे नाव देणे आवश्यक करावयाचे असल्यास नावापुढे ’सरोगेट’ लिहावे. इच्छुक माता-पित्याचीं नावे लिहिलेली असावी व तीं स्वत: (एक वा दोघेंहि) ’जनक /जननी’ आहेत कीं नाहीत याचाहि उल्लेख केलेला असावा. ही सर्व माहिती अर्थात करारांतील उल्लेखांनुसारच लिहिली जाईल. असे केल्यास अपत्याच्या मातृ-पितृत्वाबद्दल कोणताहि संदेह राहाणार नाही.
३. राष्ट्रीयत्व. - ’इच्छुक’ माता व / वा पिता भारतीय नागरिक नसल्यास, सरोगसी करारात बालकाचे राष्ट्रीयत्व कोणते मानले जावे याची स्पष्ट तरतूद असावी व अर्थातच ज्या राष्ट्राचे नागरिकत्व बालकाला मिळावयास हवे असेल त्या राष्ट्राची आगाऊ संमति करारासोबत जोडलेली असावी. सरोगेट माता व ’इच्छुक’ माता-पिता सर्वच अ-भारतीय असल्यास अशा बालकाचा भारतात जन्म होण्यास कायद्याची मान्यता असावी काय? हे कठीणच ठरेल कारण तिघेंहि अभारतीय असल्यास भारतीय कायदाच त्याना लागू होणार नाही. मात्र अनपेक्षितपणे असा जन्म भारतात झाल्यास काय करावे?
४. अपवादाने क्वचित सरोगेट माता हीच बालकाची ’जननी’हि (’अनुबंध’ प्रमाणे) असल्यास, तिचा जन्मानंतर बालकावर कोणताही हक्क असणार नाही अशी स्पष्ट तरतूद करारात हवी. मात्र जन्मदाखल्यात तिचे नाव येणे अनिवार्य राहीलच व तिचे ’जननीत्व’हि दाखल्यावर येईल. त्यामुळे पुढे त्या बालकाला ही गोष्ट पूर्ण अज्ञात राहणार नाही! कालांतराने तिने ते बालक मोठे झाल्यावर त्याचेकडून मातृत्वाच्या अधिकारात काही मागण्या करणे अशक्य नाही! हे सर्व घोटाळे टाळण्यासाठी सरोगेट माता ही ’जननी’ नसावीच हे माझ्या मते जास्त युक्त!
५. होणार्‍या कायद्यामध्ये सरोगेट माता कोणाला होतां येईल याबद्दल वैद्यकीय बाबती सोडून इतर काही तरतुदी हव्यात. उदा. वय, वैवाहिक स्थिति (अविवाहित मुळीच नसावी), नवर्‍याची (असल्यास) संमति, आधीचे अपत्य असणे, वगैरे. त्याशिवाय क्लिनिक/डॉक्टर यांनी कोणते वैद्यकीय निकष लावावे याबद्दलहि काही किमान मार्गदर्शक तरतुदी असाव्या.
६. लॉ कमिशनच्या रिपोर्टवरून असा ग्रह होतो कीं त्याना पैसे घेऊन होणार्‍या सरोगसीला मान्यता द्यावयाची नाही. मात्र ही आता वस्तुस्थिती आहे. भारतात (वैद्यकीय खर्चाव्यतिरिक्त) पैसे घेऊन सरोगसी मोठ्या प्रमाणावर चालते आहेच. त्यावर बंदी घातल्यास बेकायदेशीरपणे ती चालूच राहील व ते जास्त घातक ठरेल. तेव्हा त्याला कायद्याची मान्यता असावीच. मात्र काही निर्बंध त्याच्या सर्रास व्यापारावर व ’मध्यस्थां’वर असावे.
७. अनेक अनपेक्षित प्रश्न पुढेहि उत्पन्न होत राहतीलच पण त्यावर पुढे वेळोवेळी तरतुदी करतां येतील. कायदा करण्याची वेळ आतां खासच आलेली आहे तेव्हां विलंब टाळावा.

Thursday, July 08, 2010

सरोगसी

सरोगसी


’अनुबंध’च्या निमित्ताने दि. ७ जुलै रोजीं सोबतीच्या साप्ताहिक कार्यक्रमात सोबतीचे उपाध्यक्ष व पार्ल्यातील एक नामांकित वकील व समाजकार्यकर्ते श्री. सुरेश निमकर यांचे ’सरोगसी’ या विषयाच्या कायदेशीर बाजू समजावून देणारे अतिशय उद्बोधक असे व्याख्यान झाले. त्यातील काही महत्वाच्या गोष्टींबद्दल या ब्लॉगवर लिहिणे आवश्यक वाटते. श्री. निमकर यानी काही प्रमुख मुद्दे मांडले ते असे.
१. भारतामध्ये ’सरोगसी’ बाबत स्वतंत्र कायदा नाही. मात्र सरोगसी बेकायदेशीर ठरत नाही.
२. भारतात नागरिकांसाठी व परदेशीयांसाठीहि सरोगसीची सोय उपलब्ध करून देणार्‍या संस्था व क्लिनिक्स आहेत. ’लीलावती’ सारख्या नामांकित हॉस्पिटल्समध्येहि हे काम होते.
३. सरोगेट माता म्हणून काम करण्यास बहुतकरून अगदीं गरीब परिस्थितींतील स्त्रियाच पुढे येतात. बर्‍याच वेळां त्यांची शरीरप्रकृतिहि दुबळी असते त्यामुळे सुरवातीला त्यावरच उपचार करावे लागतात.
४. सरोगेट मातेला साधारण २ लाखापर्यत नक्त मोबदला मिळतो. सर्व वैद्यकीय खर्च, प्रवासखर्च विचारात घेऊनहि एकूण खर्च (परदेशातील जोडप्यांना) २५-३० लाखापर्यंतच येतो तो इतर देशांचे मानाने खूप कमी असल्यामुळे अनेक परदेशी जोडपीं यासाठी भारत पसंत करतात.
५. स्वतंत्र कायदा नसल्यामुळे सरोगसी करारातील तरतुदींना फार महत्व येते. मात्र काळजीपूर्वक केलेल्या करारांतहि अनपेक्षित अडचणी उभ्या राहतात व प्रकरणे कोर्टात जातात व कोर्टांना स्वत:च विचार करून बालकाच्या हिताच्या दृष्टीने योग्य काय याचा निर्णय करावा लागतो.
६. इंडियन मेडिकल कौन्सिलने सरोगसी काम करणार्‍या डॉक्टर्सनी वा क्लिनिक्सनी काय नियम पाळावे याबद्दल मार्गदर्शक तत्त्वे ठरवून दिलीं आहेत.
७. इतर कायद्यांचा विचार करतां सरोगसीने जन्म झालेले बालक व नैसर्गिक औरस बालक यांच्या वारस वगैरे कायदेशीर हक्कात फारसा फरक पडत नाही.
८. सरोगसी ही कल्पना आता फार पुढे गेली आहे. ’गे’ वा ’लेस्बियन’ जोडप्यांनीहि सरोगसीचा आधार घेतल्याचे दिसून येते.
९. जगातील इतर देशातहि सरोगसीबाबत एकमत नाहीं. काही देशांमध्ये अजिबात मान्यता नाही तर काही देशांमध्ये मान्यता आहे पण अटी असतात. युनायटेड स्टेट्समध्ये राज्याराज्यांतहि याबाबत फरक आहेत.
१०. परकीय नागरिकांनी भारतातील सरोगसीच्या सोयीचा फायदा घेतला तर अनेक प्रश्न उद्भवल्याच्या केसेस वाचावयास मिळतात.
११. भारतात ’सरोगसी’बद्दल सर्वंकष कायदा हवा असा विचार चालू आहे. लॉ कमिशनने रिपोर्ट तयार केला आहे व एक बिल लौकरच मांडण्यात येणार आहे.
श्री. निमकरांच्या उद्बोधक व्याख्यानानंतर त्यांचे अभिनंदन करून श्री. फडणीस यानीहि काही माहिती सांगितली.
१. ’अनुबंध’ मधील सरोगसी आता कालबाह्य झाली आहे. आता सरोगसीमध्ये सरोगेट मातेचे काम फक्त गर्भ वाढवण्याचे असते. ती ’जननी’ असत नाही.
२. भारतात मुंबई दिल्ली च्या बरोबरीने गुजरातेत आणंद या शहरी मोठ्या प्रमाणावर सरोगसीचे काम चालते. बीबीसी वरून तेथे हे काम करणार्‍या डॉक्टर्सच्या मुलाखतीहि झाल्या आहेत. आणंद ही भारताची सरोगसीची राजधानी आहे.
३. सरोगेट माता होणार्‍यांना काही मानसिक दडपण वाटल्यास क्लिनिक चालवणार्‍या लेडी डॉक्टर त्यांची समजूत घालतात कीं तुम्ही काही बेकायदेशीर काम करत नाही वा अनैतिकहि वागत नाही. तुम्ही दुर्दैवी जोडप्यांना अपत्यसुख मिळवून देता म्हणजे देवाचे काम करतां. आणंदमध्ये अनेक, पदरीं मुलें असलेल्या, गरीब वा विधवा स्त्रियांनी या मार्गाचा अवलंब करून आपल्यापुढील अवघड प्रश्न सोडवले आहेत.
४. परदेशांत सिंगल मदर्स वा फादर्स, घटस्फोटित वा विधुर व्यक्ति यानाही सरोगसीचा वापर करून अपत्ये हवीं असतात व अशा केसेस वाढत जाणार आहेत.
५. भारतात ही सोय कमी खर्चात व उत्तम वैद्यकीय सुविधांचा वापर करून मिळते त्यामुळे परदेशी व्यक्तींचा ओघ भारताकडे अधिकाधिक वळणार आहे.
६. याबाबत कायदा होतो आहे ही आनंदाची गोष्ट आहे.
कार्यक्रम सर्व उपस्थिताना अर्थातच आवडला. आमच्या वाचकानाहि तो उद्बोधक वाटेल.

----- संकलन: श्री प्र.के. फडणीस

Monday, July 05, 2010

४ जुलैचे अप्रतिम दारूकाम


















४ जुलै हा अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन. तो दर वर्षी उत्साहाने सर्व देशभर साजरा होतो. अनेक शहरांमध्ये या निमित्ताने सार्वजनिक ठिकाणी शोभेचे अप्रतिम दारूकाम प्रदर्शित होते व लोक उत्साहाने ते उघड्यावर एकत्र जमून पाहतात. साधारण अर्धापाउण तास हे चालते. या वर्षी झालेल्या दारुकामाचे अनेक फोटो न्यूयॉर्क टाइम्सवर मला पहावयास मिळाले. त्यातले काही उतरवून घेऊन येथे दिले आहेत. आपणाला ते नक्कीच आवडतील.