Tuesday, November 23, 2010

हंसरा झरा लुप्त झाला ( कै. शुभांगना बापट)

कै. शुभांगना बापट यांचा जन्म ६ सप्टेंबर १९२९ ला मुंबईत झाला . योगायोगाने त्यांचा मृत्युही सप्टेंबर मध्येच ( ९ सप्टेंबर , २०१०) वयाची ८१ वर्षे पूर्ण करून , विले – पारले येथे झाला . त्यांच्या विवाहाला १२ जून २०१० ला ६३ वर्षें पूर्ण झाली होती . त्यांनी आपले आयुष्य अत्यंत उत्साहाने , आनंदाने व इतरांना मदत करण्यांत व्यतीत केले . १९५६ सालीं , प्रथमच S.S.C. च्या परीक्षेला बाहेरून बसण्यास परवानगी मिळाली . ती संधी साधून , त्या S.S.C. प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या . संगिताची आवड असल्यामुळे , त्यांनी गांधर्व संगीत विद्यालयाच्या संगीत विशारद पर्यंतच्या परीक्षा दिल्या होत्या . त्याप्रमाणेच , वर्धा राष्ट्रभाषेची कोविद परीक्षाही त्या प्रथम श्रेणीत उत्तिर्ण झाल्या होत्या . सुगम संगितांत त्यांना रस होता व ते त्या शिकत होत्या . कविता करण्याचा छंदही त्यांनी जोपासला .
त्यांना नोकरी करण्याची अत्यंत उत्कट इच्छा होती पण त्यांच्या २ लहान मुलांचा नीट संभाळ व्हावा व त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत या उद्देशाने, त्याच्या यजमानांनी त्यास नकार दिला . घरचा व्याप सांभाळून संसार उत्तम रित्या कसा करावा हे त्यांच्याकडून शिकण्याजोगे होते .शिकण्याची आवड असल्यामुळे ,त्या स्वस्थ बसल्या नाहीत . आयुर्वेदाचे , स्वामी या गुरूंकडुन ७ वर्षे शिक्षण घेऊन , त्याचा उपयोग गरजूंकरिता त्यांनी विनामुल्य केला . पार्ल्यातील श्री. नविनभाई शहा व अहमदाबादचे एक शिक्षक यांच्याकडे अक्युप्रेशरचे ज्ञान त्यांनी प्राप्त केले व त्याचाही विनामुल्य उपयोग गरजूंकरिता केला . त्या स्वत: नियमित योगासने करीत . सामाजीक कार्याची गोडी असल्यामुळे , विले-पारले येथील लोकमान्य सेवा संघाचे टिळक मंदिर , विले-पारले महिला संघ , स्वातंत्र्यवीर सावरकर केंद्र व सोबती (ज्येष्ट नागरिक संघ ) या संस्थांच्या त्या आजीव सक्रीय सभासद होत्या . सोबतीच्या कार्यकारी मंडळावर पहिली स्त्री सभासद म्हणून त्यांनी २ वर्षे काम केले . तसेच सोबतीच्या पहिल्या स्त्री उपाध्यक्ष म्हणूनही २ वर्षे काम पाहिले . सोबतीच्या गरजू सभासदांना त्या आयुर्वेदिक औषधे व अक्युप्रेशरचा उपचार विनामुल्य करीत आणि त्याने गुणही येई . स्पर्धांमध्ये सहभागी होणे त्यांना आवडे व त्यांत कांही बक्षिसेही त्यांना मिळाली होती . महाराष्ट्रांतील ज्येष्ट नागरिक संघांच्या महासंघाची दरवर्षी निरनिराळ्या ठिकाणीं अधिवेशने भरतात . त्यात त्यांनी , नाशिक , नागपुर , कोल्हापुर , अकोला , डोंबिवली , मुलुंड , चेंबुर इत्यादि ठिकाणी भाग घेतला होता . ( विशेष म्हणजे अकोला अधिवेशनांत “आनंद द्यावा – आनंद घ्यावा ” या विषयावर त्या छान बोलल्या होत्या . याच अधिवेशनांत , फेसकॉमचे अध्यक्ष मा .श्री . रमणभाई शहा यांनी श्री. बापट यांना फेसकॉमचे ’ देवानंद ’ ही पदवी बहाल केली होती .) फेसकॉमचे संस्थापक अध्यक्ष कै. डॉ. राधाकृष्ण भट , कै . प्रभाकर गोरे , कै. Y. B. पाटील तसेच श्री. त्र्यंबकराव देशपांडे या अध्यक्षांशीही त्यांचा चांगला परिचय होता व बापटांच्या घरी येणे-जाणे असे . श्री. विनायकराव दाते ( सह-संपादक “मनोयुवा”) यांचेही बापटांकडे जाणे-येणे असे . अर्थांत या सर्वांचा पाहुणचार शुभांगना ताई आनंदाने करीत . महासंघाच्या सुरुवातीच्या काळांत , पुण्याचे कै . पु . शं . पतके “ कांचनकल्प “ या मासिकाचे संपादन करित असत . त्यात बापट बाई , “ घरगुती औषधे : आजी-बाईचा बटवा" हे सदर लिहीत असत हे पुष्कळांना माहित नसेल . अशा या हंसतमुखाने सर्वांचे स्वागत करणाऱ्या , गोड बोलण्याने छाप पाडणाऱ्या एक गुणवंत कार्यकर्त्या आपल्यातून निघून गेल्या आहेत व त्याचे फार दु:ख होते . जन्माला आलेला प्राणीमात्र हा केव्हातरी कायमचा जाणारच ही भावना हे दु:ख हलके करायला मदतीला येईल असे वाटते .
( … लेख सोबतीच्या मित्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे .)

No comments: