Monday, November 09, 2009

दिलिप प्रभावळकर ... एक मुलुखगिरी

दिलिप प्रभावळकरांची मुलुखगिरी

** लंडनच्या महाराष्ट्र मंडळाच्या गणपतीची स्थापना एका चर्चमधे होते. अर्थांत, हे चर्च आता कार्यान्वित नाही व महाराष्ट्र मंडळाने ते भाडेतत्वावर घेतले आहे.
** नैरोबीत, महाराष्ट्र मंडळाची स्वत:ची अशी दुमजली इमारत आहे . देशो-देशीच्या महाराष्ट्रमंडळांत हे एकमेव उदाहरण असावे.
** स्टिव्हन स्टिलबर्ग या जगप्रसिद्ध निर्मात्याने टॉम हॅंक या सु-प्रसिद्ध नटाला घेऊन, एक चित्रपट काढायचे ठरविले. एका पात्राकरिता, प्रभावळकरांना घ्यायचा विचार होत होता. मुंबईला एक बैठकही झाली. अट अशी की दिलिप प्रभावळकरांना एका सप्त-तारांकित हॉटेलांत १६ आठवडे मुक्काम ठोकावा लागेल. प्रभावळकरांना हा रोल कांही मिळाला नाही. प्रभावळकरांचे मुलाखतकार स्वप्नील जोशी म्हणाले, प्रभावळकरांसारख्या नटाला तो रोल न मिळणे ही वास्तविक स्टिव्हन स्टिलबर्गची हानी होती, प्रभावळकरांची नव्हे !
** प्रभावळकरांना, अभिनयाबद्दल, राज्यस्तरावर व राष्ट्रस्तरावरसुद्धा बक्षिसे मिळाली आहेत. त्यांनी २१ पुस्तकेही लिहिली आहेत. त्यांतील बोक्या सातबंडे या पुस्तकाला लेखनाबद्दल बक्षिस मिळाले आहे.
** प्रभावळकरांनी ’बेकाबू’ या हिंदी चित्रपटांत ९ भूमिका केल्या होत्या हे फारशे कोणाला माहित नाही. पण हा चित्रपट चालला नाही.
** सिएटलमधील एका कार्यक्रमांत, प्रभावळकरांनी ’ कृष्णराव हेरंबकर ’ ही भूमिका करून दाखविली. कार्यक्रमाचे शेवटी, ऐंशी-नव्वदितले एक म्हातारबुवा भेटायला आले. त्यांनी प्रभावळकरांना साक्षात साष्टांग नमस्कार घातला. प्रभावळकरांना कसेसेच झाले. म्हातारबुवा म्हणाले, ’अहो, हा नमस्कार कोकणांत आयुष्य काढलेल्या माझ्या वडिलांना आहे .’
** महाराष्ट्रांतून इझ्रायेलला गेलेल्या, मूळ मराठी मायबोली असलेल्या ज्युंची संख्या बरीच आहे . अशाच एका कुटुंबात,
प्रभावळकर , तेथील कार्यक्रमानिमित्ताने राहिले होते. त्यांच्या तीन कार्यक्रमांना प्रत्येकी ४५० ज्यू प्रेक्षक उपस्थित होते. घरी , ते प्रभावळकरांशी मराठींत संभाषण करीत पण आप-आपसांत हिबृ भाषेंत बोलत. ( इझ्रायेलमध्ये , पूर्वी मृत समजली जाणारी हिबृ , ही राष्ट्रभाषा आहे व सर्व ज्यू नागरिक तिचा वापर करतात.)
** अभिनया व्यतिरिक्त , प्रभावळकरांना इतर कोणतेही व्यसन नाही.

[ दूरदर्शनच्या एका वाहिनीवर , स्वप्नील जोशी यांनी दिलिप प्रभावळकरांची एक मुलाखत घेतली, त्या आधारे ..]

Friday, November 06, 2009

वसई किल्ला- बंदर मासेमारी ...

ओहोटीची वेळ . समोर, दूर, डावीकडे वसईच्या खाडीवरील रेल्वेचा पूल तर डावीकडे भाइंदरची वस्ती.
तासलेले शिंदीचे (खजुरीचे) झाड। या भागात झाडाला चीर पाडली की त्यांतून निरा पाझरते. तीच आंबली की ताडी होते. नारळ, ताड, खजुरी वगैरे पाम जातीच्या झाडांपासून निरा / ताडी मिळते. हा त्या झाडाचा जीवनरसच। निरा काढायला लागल्यानंतर, कांही वर्षांतच ते झाड मरते.

कस्टम्सचे ऑफिस.


सुर्यास्तानंतर ... मागे उत्तनचा डोंगर.



सुर्यास्त !



खाडींतील वाहतुकीवर गस्त ठेवण्याकरिता, सीमा-शुल्क-खात्याचे ऑफ़िस येथे आहे. त्या ऑफिस जवळील हा धक्का. समोर भाइंदरच्या इमारती दिसताहेत.


हे लहानसे देऊळ किल्ल्यातच आहे.


कांही प्रमाणांत, मासे असे सुकवून विकले जातात. पण फार मोठ्या प्रमाणांत, ते विकले जाईपर्यंत, बर्फात टिकवितात। बर्फाचे कारखाने बहुतेक कोळीवाड्यांत असतात.


समुद्रांतून मासे आणलेले मचवे किनार्‍याजवळ दिसताहेत। दूर, समोर, उत्तनचा डोंगर. केशवसृष्टी येथेच आहे.


किल्ल्याच्या तटाबाहेर, दक्षिणेला, खाडीच्या किनार्‍याला, मासेमारीचे, किल्लाबंदर आहे. न विकली गेलेली अगदी छोटी मासळी, अशी वाळत घालतात.









Thursday, November 05, 2009

विचारवंतांचे विचार करण्याजोगे विचार

अज्ञान हे नेहमीच अस्तित्वांत असते व भीतीची निर्मिती अज्ञानापोटी असते.
जागतीक कीर्तीचे अग्रगण्य धनवान व मायक्रोसॉफ्ट या प्रख्यात कंपनीचे जनक बिल गेट्स…

अज्ञान्यांची बुद्धिमत्ता, शिक्षितांच्या अक्षमतेपेक्षा जास्त उपयोगी पडते.
अज्ञात प्रज्ञावंत …

ईश्वराची प्राप्ती करून घेण्याच्या मार्गांत धर्म हा अडसर ठरतो.
de Bono …

आपल्याला किती कमी समजते हे कळण्याकरिता खूप कांही समजणे (खूप ज्ञान असणे ) फार आवश्यक आहे .
एक अज्ञात प्रज्ञावंत …

जेव्हा भारतीय गजराज (जागतीक रंगमंचावर ) नृत्य करू लागेल तेव्हा इतर सर्व (जागतीक ) मंचाबाहेर पडतील .
मॅनेजमेंट गुरु सी. के. प्रहलाद यांची १९९०च्या दशकांत भविष्यवाणी …

देव स्वयंभू आहे का ? की आपणच (मानवाने ) त्याला अस्तित्वांत आणले ?
ज्ञानपीठ पारितोषिक विजेते तमिळ लेखक डी. जयकांथन …

तुम्ही (रहावयास ) निवडलेल्या देशांत तुमची भरभराट होवो. पण तुमच्या नाळेची बांधिलकी ज्या तुमच्या मातृभूमीशी आहे, तिला विसरू नका .
अबुल पाकीर जैनुद्दिन ( A.P.J. ) अब्दुल कलाम …

Sunday, November 01, 2009

टवाळा आवडे विनोद ...

सरदारांच्या नांवावर विनोद खपविणे, खरे तर योग्य नव्हे. ही जमात, इतरांइतकीच किंबहुना इतरांहून कांकणभर जास्तच हुशार आणि श्रम करणारी असते. पण काय करणार , वाचकांना (आणि लेखकांनाही ) ही एक संवयच लागली आहे . तर त्याच पठडींतील कांही विनोद….
*** एका सुपरमार्केटमद्ध्ये …
सरदार – तुमच्याकडे रंगित टी. व्ही. आहे का ?
विक्रेता – नक्कीच .
सरदार – मग मला एक हिरव्या रंगाचा द्या बरं !

*** सरदारचे लक्ष्य सुपरमार्केटमद्ध्ये थर्मॉस फ़्लास्ककडे जाते.
सरदार – हे काय आहे ?
विक्रेता – तो थर्मॉस फ्लास्क आहे.
सरदार – त्याचा उपयोग काय करतात ?
विक्रेता – त्यांत गार वस्तू गार व गरम वस्तू गरम रहाते.
सरदारने एक थर्मॉस विकत घेतला. दुसर्‍या दिवशी, सरदारजी थर्मॉस घेऊन कामावर गेले.
सरदार बॉसने विचारले – हे काय आहे ?
सरदार – हा थर्मॉस आहे.
सरदार बॉस – वा ! पण त्यांत आहे काय ?
सरदार – दोन कप गरम कॉफी आणि एक ग्लास थंडगार कोक .

*** पंजाबात, सरदारने एक आंसरिंग मशीन ( answering machine) लावले. पण दोनच दिवसांनी ते काढुनही टाकले. कारण ? मित्रांकडून तक्रारी यायला लागल्या – “ साला फोन उठाके बोलता है की मै घरपे नही हूं ।“

*** सरदारजी सुपरमार्केटमद्ध्ये गेले.
सरदारजी – मला हा छोटा टी. व्ही. विकत घ्यायचा आहे.
विक्रेता – क्षमा करा,आम्ही सरदारना कांहीच विकत नाही.
सरदारजी घाइघाइने घरी गेले, पगडी काढली, हेअर स्टाइल बदलली आणि सुपरमार्केटमद्ध्ये परत गेले.
सरदारजी – मला हा छोटा टी. व्ही. विकत घ्यायचा आहे.
विक्रेता – क्षमा करा,आम्ही सरदारना कांहीच विकत नाही.
सरदारजी मनांत म्हणाले – डॅम ! त्याने मला परत ओळखले. घरी जाऊन त्यांनी आपला चेहरा मोहरा पूर्ण बदलून टाकला, केंस कापले, केंसांचा रंग बदलला, नेहमीपेक्षा वेगळे कपडे परिधान केले, डोळ्यांना मोट्ठा गॉगल लावला आणि कांही दिवसांनी परत सुपरमार्केटमद्ध्ये गेले.
सरदारजी – मला हा छोटा टी. व्ही. विकत घ्यायचा आहे.
विक्रेता – क्षमा करा,आम्ही सरदारना कांहीच विकत नाही.
सरदारजी आता मात्र चक्रावलेच.
सरदारजी – मी सरदार आहे हे तुम्ही कसे जाणता ?
विक्रेता – कारण हे मायक्रोवेव्ह ओव्हन आहे , टी. व्ही. नाही !

*** एका सिनेमाला १८ सरदारजी गेले. का ?
कारण १८ च्या खाली त्या सिनेमाला प्रवेश नव्हता .

Friday, October 30, 2009

वसईचा किल्ला ... भग्न अवशेष

पश्चिमेकडील तट, ज्या बाजूने वसई गांवाकडे जाता येते. ह्या तटाची रुंदी जवळ जवळ ३० फुट आहे. दोन रुंद दगडी भिंतींच्या मद्ध्ये दगड, माती वगैरे भरून हा तट बांधला आहे. ह्या तटाचा कांही भाग तोडून, आता किल्ल्यात जाण्याचा रस्ता तयार केला आहे.
दुरून दिसणारा एक पडका बुरूज.
आणखी एक भग्न अवशेष.
किल्ल्यांतील या मंदिराचा उपयोग हिंदू मरणोत्तर विधींकरिता करतात.
भग्नावस्थेत असलेल्या अनेक वास्तू.
पुरातत्वविभागाची हल्लीच बांधलेली वास्तू. अर्थांत, ही इमारत सुस्थितिंत असणारच !
चर्चची भग्न वास्तू. पुरातत्व विभागाकडून (A। S. I.) सद्ध्या याच्या दुरुस्तीचे काम चालू आहे.
पूर्वेकडील दरवाजा. या बाजूने दक्षिणेकडील खाडीकडे जाता येते।
पूर्वेकडील तटबंदी. याच्या दक्षिणेला वसईची खाडी आहे।
चिमाजी आप्पांचे स्मारक. चिमाजी आप्पांनी हा किल्ला पोर्च्युगिजांपासून अत्यंत अवघड अशा उत्तर बाजूने हल्ला करून जिंकून घेतला. किल्ल्याला एका बाजूने खाडी, दोन बाजूंनी बिकट दलदल व चौथ्या बाजूला वसई गांव, जेथला किल्ल्याचा तट ३० फुट रुंदीचा आहे.
किल्ल्यांतून फेरफटका मारल्यानंतर, मन विषण्ण होते. भारतांत ह्या व अशा अनेक वास्तूंची जपणूक होत नाही व प्रत्यही त्यांचा ह्रास होतो आहे.









Wednesday, October 28, 2009

विचार करा - एक विरोधाभास

होमियोपॅथीमधील एक विरोधाभास
होमियोपॅथीच्या तत्वाप्रमाणे, औषध जेव्हढे विरल ( dilute ) कराल, तेव्हढे ते अधिक परिणामकारक (potent ) होत जाते. आता गंमत काय होते … कोणतेही द्रावण ( solution ) एका मर्यादेपलीकडे विरल करता येत नाही. कसे ते पहा … एक होमियोपॅथीच्या मात्रेमध्ये, जे संयुग, गुण आणते, त्याची संख्या अमुक आहे असे समजा. विरल करता करता, एक अशी स्थिती येते की जेव्हा, त्या मात्रेमध्ये, संख्येने केवळ एकच संयुग उरते. होमियोपॅथिचा समज जर ग्राह्य धरला, तर ही मात्रा त्या औषधाची सर्वांत प्रभावी मात्रा असायला हवी. ही मात्रा जर आणखी, समजा दुपटीने विरल करण्याचा प्रयत्न केला, तर एका मात्रेत, संख्येने एकच संयुग राहील तर दुसर्‍या मात्रेत एकही संयुग राहाणार नाही. संख्येने एक असलेल्या संयुगाची (molecule ) आणखी विभागणी होऊ शकत नाही. त्याचे विघटण अणुंमध्ये होऊ शकते. व अणुंमध्ये मूळ संयुगाचे गुणधर्म नसतात. तसेच, एखाद्या मात्रेमधील संयुगांची संख्या मोजणे हे जवळ जवळ अशक्यप्राय आहे. आता बोला .....

अमेरिकेतील फॉल सीझन

अमेरिकेच्या बर्‍याच भागांत सद्ध्या फॉल सीझन चालू आहे. Summer संपून Winter सुरू होण्याचा संधिकाल म्हणजे फॉल सीझन. या काळामध्ये झाडांच्या पानांची झड होते. बहुतेक झाडे पूर्णपणे निष्पर्ण होतात. मात्र पाने गळून पडण्यापूर्वीं हिरव्या रंगा ऐवजी त्यांचेवर अनेक विलोभनीय रंग चढतात. निसर्गाचा हा रंगांचा खेळ मन मोहून टाकणारा असतो. निरनिराळे रंग उधळणारीं झाडे पहाण्यासाठी माणसे हौसेने रानावनात फिरतात, फोटो काढतात. आणि इतराना पाठवतात. असेच आमच्या नात्यातील कोलंबसमध्ये असलेल्या संदीप बापत व गौरी बापट (लिमये) या हौशी व्यक्तींकडून माझ्याकडे आलेले काही फोटो त्यांच्या परवानगीने आपल्यासमोर ठेवतो आहे.