Wednesday, May 27, 2009

`कैलास-मानसरोवर यात्रा- एक अमृतानुभव!’









कैलास









मानसरोवर









मानसरोवर









कैलास









कैलास

कैलास-मानसरोवर यात्रा...- एक अमृतानुभव!

दिनांक १३ मे २००९ रोजी सोबतीच्या साप्ताहिक सभेमध्ये, ‘सोबती’ परिवारामध्ये नव्यानेच दाखल झालेले एक सभासद श्री. प्रभाकर ठोसर यांनी एक विशेष कार्यक्रम सादर केला-‘प्रवास वर्णनाचा’! ‘विशेष’ म्हणण्याचे कारण असे की प्रवास वर्णन प्रभावीपणॆ श्रोत्यांपर्यंत पोचविण्यासाठी संपूर्ण कार्यक्रमात त्यांनी दॄक आणि श्राव्य अशा दोन्ही माध्यमांचा सुयोग्य वापर केला.
कार्यक्रमाचे नांव होते ‘कैलास-मानसरोवर यात्रा-एक अमृतानुभव!’ या अनुभवाची ‘प्रचीति’ श्रोत्यांना आणून देत असताना, त्यांच्या ओघवत्या भाषेतील प्रवासवर्णनाबरोबच, एकीकडॆ व्यासपीठावर उभारलेल्या मोठ्या पडद्यावर प्रवासातील क्षणचित्रेही एकामागून एक झळकत होती. अशा एकूण ५८ छायाचित्रांच्या माध्यमातून श्री.ठोसर यांनी ‘कैलास-मानसरोवर’ श्रोत्यांसमोर कसे साकारले त्याचेच हे शब्दांकन !

‘कैलास-मानसरोवर यात्रा’ ही जगातील अत्यंत दुर्गम प्रदेशातील,आणि म्हणूनच अतिशय खडतर अशी यात्रा आहे. पश्चिम-तिबेट प्रांतामध्ये समुद्रसपाटीपासून २२००८ फ़ूट उंच असलेला प्रचंड हिमाच्छादित पर्वत म्हणजेच हा वेदकाळातील मेरू पर्वत.. शिवपार्वतींचे निवासस्थान कैलास पर्वत...! या महाकाय पर्वताच्या पायथ्याशी, परंतू समुद्रसपाटीपासून १५२४० फ़ूट उंचीवरील २०० चौरस मैलांच्या विस्तीर्ण प्रदेशात पसरलेला अथांग जलाशय म्हणजेच ‘मानसरोवर’! महाभारतात व्यासांनी वर्णिलेले ‘बिंदुसार’ म्हणजेच मानसरोवर’..!

‘कैलास-मानसरोवर’ ही ३० दिवसांची ‘पायी-तीर्थयात्रा’ भारत सरकारतर्फ़े नियमितपणे आयोजित केली जाते. खाजगी पर्यटन संस्थांच्या माध्यमातूनही मुंबईपासून १६ दिवसांची परतीची यात्रा (काठमांडू पासून जीपच्या साहाय्याने) उपलब्ध असते. यात्रेत सहभागी होण्यापूर्वी प्रवाशांना तिथल्या प्रचंड उंचीवरील विरळ हवेमुळे उद्भवणा~या शारीरिक आणि मानसिक समस्यांची पूर्णतः जाणीव करून दिली जाते व खबरदारीची उपाय योजना म्हणून योग्य त्या शारीरिक स्वास्थ्य विषयक वैद्यकीय प्रमाणपत्रांच्या पूर्ततेनंतरच यात्रेत सहभागी करून घेतले जाते ! भारतीय प्रदेशावरून ही यात्रा नेपाळ मार्गे तिबेटमध्ये जाते. तिबेटच्या पठारी वाळवंटातून कैलासाच्या पायथ्यापर्यंतचा जीपचा प्रवासही रस्त्यातील सततच्या खाचखळग्यांमुळे अक्षरश:सर्वांग घुसळून काढणारा, हाडें खिळखिळीत करणारा आहे! भारतीय नागरिकांना नेपाळसाठी व्हिसा लागत नाही, परंतू तिबेट हे चीनच्या ताब्यात असल्यामुळे, चीनचा व्हिसा मात्र लागतो. यात्रेसाठी दरडोई सुमारे एक लाख रुपये खर्च येतो.
अशी ही एकंदर अडथळ्यांची मालिका असूनही लोक ह्या यात्रेत स्थान मिळविण्यासाठी धडपडत असतात याचे कारण जर कांही असेल तर ते एकच आणि ते म्हणजे ‘अव्यक्ताची आंतरिक ओढ’.. बस्स!
त्या अनामिक ओढीनेच सुरु होते ही यात्रा.. दिव्यत्वाची ‘प्रचीति’ घेण्यासाठी! नेपाळ सीमेपासून जीपमधून तिबेटमध्ये प्रवेश केल्यानंतर ख~या अर्थाने यात्रा सुरू होते. या संपूर्ण प्रवासात अनंत अडचणीं आहेत, शरीर गोठवून टाकणारे थंडगार बोचरे वारे आहेत, दाहक उन्हाचा तापही आहे, पण त्या पार करून तुम्ही येथपर्यंत,एवढ्या उंचीवर आलांत की मग मात्र.. "अरे?, स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो याहून वेगळा काय असणार आहे..? हाच स्वर्ग आहे !" असे म्ह्टल्यावाचून राहवत नाही. कारण संपूर्ण कैलास-मानस परिसर हा ‘केवळ एकमेवाद्वितीय’ अशा निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. कैलास पर्वतावर प्रत्यक्ष कोणीही जाऊ शकत नाही. त्याचे दूरवरून कडेकडेने दर्शन घेत त्याला प्रदक्षिणा घालावी लागते. संपूर्ण कैलास परिक्रमा तीन दिवसांची असते. ती पायी, याकवर अथवा खेचरावर बसूनच पुरी करावी लागते.परिक्रमेतील हा प्रवास अतिशय खडतर व दमछाक करणारा आहे. परंतू येथे गूढ संवेदना जाणवते,संचारते, व तीच शरीर पुढे ढकलते असा दैवी भास होतो. हा अद्भुतरम्य गिरिराज पूर्व दिशेकडून पाहिले असतां स्पटिकासारखा शुभ्र-स्वच्छ, तर पश्चिमेकडून माणिकासारखा लाल, दक्षिणेकडून नीलमण्यासारखा तेजस्वी, तर उत्तर दिशेकडून सुवर्णराशीसारखा झळाळत असताना पाहून डोळ्यांचे पारणे फ़िटते. कैलास पर्वताच्याच शिखरावरून अवतरते ती पवित्र गंगा नदी ! महर्षि वेदव्यास, भृगु, वसिष्ठ, पराशर आदि देवर्षींच्या तप:साधनेने पावन झालेल्या या पुण्यभूमीत पाऊल टाकल्यानंतर, एखाद्या ध्यानस्थ ऋषीप्रमाणॆ भासणा~या कैलास-पर्वताचे दर्शन होताच, तात्काळ गळून पडतात त्या बेगडी मानवी प्रतिष्ठा.. ! जळून जातात दंभ-अहंकाराच्या भ्रामक कल्पना..! विरून जाते ‘स्वत्त्वाची जाणीव’..! नतमस्तक होतो आपणा त्या कैलासरूपी भगवद्दर्शनाने, हात नकळत जोडले जातात आणि ओठांतून शब्द येतात....
कैलासराणा शिवचंद्रमौळी, फ़णिंद्र माथा भृकुटी झळाळी ।
कारुण्यसिंधो भवदु:ख हारी, तुजवीण शंभो,मज कोण तारी..!
आपण उभे असतो एका विस्तीर्ण ,सुमारे २०० चौरस मैलांच्या भूप्रदेशावर, समुद्रसपाटीपासून १५००० फ़ूट उंचीवर! समोर महकाय कैलास पर्वत,आणि त्याच्या पायथ्याशी विसावलेला अतिविशाल जलनिधी- हेच ते मानसरोवर ! कैलास पर्वतावरचे बर्फ़ वितळून त्याचे पाणी मानसरोवरामध्ये येते. हिवाळ्यात हे सरोवर पूर्णपणे गोठून त्याचे तपमान -५०अंश इतके खाली येते! सभोवताली सर्वदूर, अतुलनीय..अनुपम सृष्टीसौंदर्य, बर्फ़ाच्छादित गिरिशिखरे, वर आकाशात सूर्यकिरणांची सप्तरंगी उधळण, हे सर्व पाहिले की वाटते "खरंच, हे जग किती सुंदर आहे..!

श्री.ठोसर यांनी सुमारे दीडतासात अशी ‘पुण्ययात्रा’ घडविल्यानंतर कार्यक्रमाच्या शेवटी सोबतीचेच सभासद श्री. विश्वास गोरे व श्री.त्रिविक्रम जोगळेकर यांनी सुद्धा, ते ‘मानसरोवर’ यात्रेला गेले होते त्या वेळचे अनुभव सांगितले. एकंदर सर्वच कार्यक्रम श्रोत्यांना खूप आवडला.