Sunday, July 27, 2008

चांदणं - भाग २

'चांदणं' कवितासंग्रहातील काही कविता या भागामध्ये आपणास वाचावयास मिळतील. कविता आपणास आवडल्या तर श्रीमती विद्या पेठे यांना २६८२७१९८ वर फोन करून जरूर कळवा व कविता ’सोबती’च्या ब्लॉगवर वाचल्याचे अवश्य सांगा! शेजारच्या स्लाइड-शो मध्ये कवितांच्या पानांचे फोटो दिले आहेत. वाचण्यासाठी फोटोवर क्लिक करा. धन्यवाद.
ब्लॉगसंचालक,
प्र. के. फडणीस.

Thursday, July 24, 2008

चांदणं - भाग १


सोबतीने दि. २ जुलै २००८ रोजी साप्ताहिक सभेत एक अनोखा कार्यक्रम सादर केला. सभासद श्रीमती विद्या पेठे यांच्या कवितांचा संग्रह – चांदणं – त्या दिवशी प्रमुख पाहुण्या डॉ. स्नेहलता देशमुख यांचे हस्ते प्रकाशित करण्यात आला. कार्यक्रमाचे नियोजन पेठे कुटुंबाने हौसेने व नेटकेपणाने केले होते. समारंभाचे सूत्रसंचालन डहाणूकर कॉलेजच्या प्राचार्या माधवी पेठे यांनी केले.
सुरवातीला श्री. मुकुंद पेठे यानी मनोगत व्यक्त करताना म्हटले की पत्नीच्या कविता आवडल्या व पुन्हापुन्हा वाचाव्याशा वाटल्या म्हणून संग्रह प्रकाशित करण्यासाठी पडतील ते सर्व कष्ट घेतले.
कवयित्री विद्या पेठे यानी कवितांबद्दल बोलताना म्हटले की मी प्रासंगिक कविता वेळोवेळी लिहिल्या, शिक्षिका असताना नाटिका व त्यांत कविताहि लिहिल्या. पण आतून काही स्फुरावं व कागदावर उमटावं असं होईतो निवृत्तीचा काळ उजाडला. त्यानंतरच माझ्या कविताना बहर आला. निसर्ग व मानवी मनाचीं स्पंदने हे माझ्या काव्याचे मूलस्त्रोत आहेत.
एक सहशिक्षिका श्रीमती वृंदा पेंडसे आस्वादक या भूमिकेतून बोलल्या. त्या म्हणाल्या कीं शाळेत इतिहास-भूगोल शिकवणार्‍या या शिक्षिकेचं संवेदनाशील मन जागृत होतं हेच या कवितांतून दिसून येतं. ’किमया’, ’चौकोनी आकाश’, ’दिवाळी’, व ’फांदी’ या कवितांचे त्यानी मर्म उलगडून दाखवलं. कवयित्रीचं जागृत, विचारप्रवण मन व अन्यायाबद्दलची चीड ’संक्रांत’, ’लोकशाही’ या कवितांतून व्यक्त होतं.
दुसर्‍या वक्त्या होत्या डॉ. चारुशीला ओक. कवितासंग्रहाला त्यांची प्रस्तावना आहे. त्या म्हणाल्या, ’ हा काव्यसंग्रह मी एका रात्रीत वाचून काढला, यातच त्याचं मूल्यमापन आलं. कवयित्रीचा दृष्टिकोन सकारात्मक आहे. आजच्या वृद्धाश्रमांच्या काळात वृद्ध, एकाकी मनाला दिलासा देणारी कुटुंबाची साथ त्यानी ’संध्याकाळ’ मध्ये रंगवली आहे. त्यांच्या घननिळा श्याम, मल्हार वगैरे गीताना लय-ताल आहे. त्या स्वत: गातात हे त्याचे कारण असावे. माणूस, दु:ख, साथ वगैरे कवितांतून लक्षणीय व वेगळा विचार व्यक्त होतो.’
प्रमुख पाहुण्या डॉ. स्नेहलता देशमुख म्हणाल्या कीं या कवयित्रीचे अनुभव बहुकेंद्री आहेत. बालगीतांबरोबरच अन्यायाची चीड व्यक्त करणार्‍या, मानवी मनाचीं स्पंदने टिपणार्‍या कविताही या संग्रहात आहेत. ’मूठभर मीठ साम्राज्य हादरवतं व दांडी गाव तीर्थक्षेत्र बनतं ’ अशी सुंदर ओळ येथे दिसते. उत्तरोत्तर अशाच चांगल्या कविता लिहिल्या जाव्यात अशा शुभेच्छा त्यानी दिल्या.
प्रकाशन समारंभानंतर यातील काही कवितांचे वाचन, श्री. विजय पंतवैद्य व श्री. मुकुंद पेठे यानी केले व ’वंदन’, ’चांदणं’, ’मल्हार’ या गीतांचे, स्वरचित चालीत, स्वत: श्रीमती विद्या पेठे यानी गायन केले. वंदन या गीताबरोबर नवोदित नृत्यांगना कु. अनुया परांजपे हिने सुंदर नृत्याविष्कार सादर केला.
आभार प्रदर्शनानंतर हा देखणा कार्यक्रम संपला.
पुढील भागामध्ये यातील काही कविता आपणाला वाचावयास मिळतील.

Saturday, July 19, 2008

साप्ताहिक कार्यक्रम




’सोबती’चा २००७-२००८ चा अहवाल हातीं आला आहे. गतवर्षी सोबतीने कोणते साप्ताहिक कार्यक्रम केले त्याचा तपशील अहवालावरून देत आहे. सोबतीच्या कार्यक्रमातील वैविध्य त्यावरून ध्यानी येईल.