Sunday, June 22, 2008

गुंततां हृदय हे - भाग ३

खटल्याच्या कामकाजामध्ये सरकारतर्फे सर्व साक्षीपुरावा पद्धतशीर मांडला गेला. सरकारी वकिलानी सर्व घटनाक्रम खुलासेवार वर्णन केला. आरोपी खिडकीतून आला. त्यावेळी जिचा मृत्यु झाला ती मुलगी, नेहा, घरात एकटीच टी. व्ही. पहात बसलेली होती. आरोपीने नेहाचा गळा दाबला, नेहाने त्याला जोरात ढकलले, आरोपी कॉफी टेबलवर धडकला, त्याची काच फुटून त्याला जखम झाली, त्याचे रक्त तेथे सापडले आहे, आरोपीची व नेहाची पुन्हा झटापट झाली. नेहाने आरोपीच्या हाताला चावा घेतला, मग रागाने आरोपीने नेहाला गोळ्या घातल्या व घरात दरोडा घालून आरोपी फरार झाला. नेहाचे आईबाप घरी आले तेव्हा नेहा जिवंत पण बेशुद्ध होती. डॉक्टर तिला वाचवू शकले नाहीत. नेहाचे हृदयदान व नेत्रदान करण्यात आले. दरोड्यातील ऐवज आरोपीपाशी मिळाला आहे. फॉरेन्सिक रिपोर्ट व इतर परिस्थितिजन्य पुरावा सादर केलेला आहे.
हे सर्व ठीक होते पण नेहा शुद्धीवर आलीच नव्हती व पोलीसांना तिचा जबाब मिळालेला नव्हता मग या सर्व घटनाक्रमाचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार कोण होता व हे वर्णन कशाच्या आधारावर केले? तेव्हा स्पष्ट झाले की हे वर्णन मानसीने पोलिसाना दिले होते. मानसी स्वत: घटनास्थळी कधीच नसल्यामुळे तिला प्रत्यक्षदर्शी साक्षीदार कसे मानावे? आरोपीच्या वकिलानी अर्थातच याला जोरदार आक्षेप घेतला. नेहाच्या हृदयाबरोबर घटनेची पूर्ण व खुलासेवार स्मृतीही मानसीकडे आली आहे हे त्याना अजिबात मान्य नव्हते. स्मृति ही मेंदूत असते, हृदयाचा त्याच्याशी काय संबंध असा त्यांचा रास्त दावा होता. बरे, ज्या व्यक्तीला नेहाचे नेत्र दान केले होते त्या व्यक्तीकडे घटनेची स्मृति गेलेली नव्हती!
सरकारतर्फे डॉ. भावे यानी सांगितले की, स्मृति ही जरी मुख्यत्वे मेंदूमध्ये असते तरी शरीराच्या इतर पेशींमध्येही ती वास करू शकते व अपवादात्मक परिस्थितीत ती स्पष्ट व खुलासेवारहि असू शकते. या केसमध्येही घटनेची सर्व स्मृति नेहाच्या हृदयाबरोबर मानसीकडे आली आहे. याबाबत अमेरिकेतील डॉक्टर ड्यून यांच्याशी त्यानी केलेला पत्रव्यवहार व त्यानी दिलेले निर्वाळे कोर्टाला सादर करण्यात आले.
आरोपीच्या वकिलानी असाहि मुद्दा मांडला की हृदयरोपणाबरोबर दात्याच्या जीवनातील बर्‍यावाईट स्मृति हृदय बसवलेल्या व्यक्तीकडे जातात असे मान्य करावयाचे म्हटले तर त्याचे दुष्परिणाम होतील, लोक हृदयरोपण करून घ्यायलाच तयार होणार नाहीत! समाज एका उपयुक्त शस्त्रक्रियेला विन्मुख होईल!
मानसीने आरोपीचे व घटनेचे केलेले खुलासेवार वर्णन पोलिसाना आरोपीला पकडण्यास उपयुक्त ठरले होते हे उघडच होते पण त्याला प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने केलेल्या वर्णनासमान मानता येईल काय हा न्यायाधीशांपुढे प्रश्न होता. मात्र न्यायाधीशानी या प्रश्नाला बगल देऊन पुरेसा व विश्वसनीय असा circumstancial evidence दाखल झालेला आहे व आरोपीचा गुन्हा शाबीत झाला आहे असे मानण्यास तो पुरेसा आहे तसेच तो विचारात घेतला असतां आरोपी्ला निरपराध ठरवणे शक्य नाही असा निष्कर्ष काढून आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा दिली. नेहाच्या आईवडिलाना अखेर आपल्या मुलीला न्याय मिळाला याचे समाधान मिळाले. मानसीला होणारा त्रासहि यानंतर बंद झाला.
ऍडव्होकेट ठाकूर यांची कथा थोडीफार काटछाट करून आपल्यासमोर ठेवली ती येथे संपली. त्यानी कथेअखेर केलेला खुलासा शब्दश: असा –
‘ह्या कथेतील जो कायद्याचा भाग आहे तो सत्य व कायद्याला धरून आहे. कथेत उल्लेखलेली, परिस्थितिजन्य पुराव्यावरून निर्णय देणारी केसहि सत्य आहे व ती ’ऑल इंडिया रिपोर्टर’मध्ये नमूद केलेली आहे.
एका व्यक्तीच्या रोपण केलेल्या हृदयाने दिलेला कौल, पुरावा म्हणून कोर्टात मान्य केलेली केस अमेरिकेत घडलेली आहे. त्या घटनेला भारतीय वातावरणात बसविणे, भारतीय दंडविधानात व एव्हिडन्स ऍक्ट्मध्ये बसविणे हा भाग काल्पनिक आहे.
ही वैज्ञानिक केस डॉ. पाल पियरसाल यांच्या ‘The Heart’s Code’ या पुस्तकात. तसेच Detroit चे ’Senai Hospital, त्यातील Dr.Dune , Psychoneuro-immunologist यांचे वैद्यकीय मत, cellulay memory ची theory, हेहि याच पुस्तकात उल्लेखलेले आहे.’
संक्षिप्त कथेमध्ये मी डॉ. ड्यून यांचे मत व विवेचन विस्ताराने दिलेले नाही. हृदयरोपण हा तसा अर्वाचीन प्रकार आहे व हृदयाबरोबर मूळ व्यक्तीच्य़ा काही स्मृति, सवयी, खास कलाकौशल्ये नवीन शरीराला मिळतात काय हा सध्यातरी कुतूहलाचा, वादाचा व संशोधनाचा विषय आहे. असे संशोधन चालू आहे असे माझ्या इतरत्र वाचनात आले आहे.

Thursday, June 19, 2008

गुंतता हृदय हे - भाग २

रात्री मानसीबद्दल विचार करत असताना डॉ. भावे, मानसोपचार तज्ञ, यांच्या मनात आले की हृदय दिलेल्या मुलीच्या आइवडलांना भेटावे. हॉस्पिटलमधून मिळालेल्या पत्त्यावर त्यांची गाठ पडली. डॉक्टरांनी सांगितलेल्या दरोड्याच्या घटनेला त्यानी दुजोरा दिला. मानसीची हकीगत ऐकून त्यानाहि वाटले की मानसीच्या मुखातून आपलीच मुलगी बोलते आहे.कारण सर्व हकीगत ती सुसंगत व बिनचूक सांगत होती. विचारांती डॉ. भावे यानी दरोड्याचा तपास करणार्‍या पोलिस अधिकार्‍यांची गाठ घेतली. घटनेला कोणी साक्षीदार नसल्यामुळे गुन्हेगार सापडला नव्हता. मात्र इतर तपास व पुरावा पोलिसांनी केला होता. डॉ. भावेंकडून मानसीची हकीगत ऐकून त्याना आश्चर्य वाटले. पाहूयातरी मानसी काय वर्णन करते ते असा विचार करून त्यानी डॉ. भावेना मानसीला घेऊन येण्यास सांगितले. मानसीचे आई-वडील प्रथम तयार होईनात. पण जर मानसीच्या वर्णनामुळे गुन्हेगार पकडला गेला तर बहुधा मानसीचा त्रास बंद होईल या आशेने ते तयार झाले. मानसीने पोलिसांना दरोड्याची सर्व हकीगत सुसंगत सांगितली. पोलिसांनी विचारले की तू चोराचे वर्णन करू शकशील काय? त्यावर तिने जणू तो तिला दिसतोच आहे असे त्याचे सर्व वर्णन केले. पोलिस चित्रकाराने वर्णन ऐकता-ऐकताच भराभर त्याचे चित्र बनवले. ते पाहिल्याबरोबर मानसी ओरडली ’हाच तो! पकडा याला. यानेच मला गोळ्या मारल्या’
चित्र हातात पडल्यावर पोलीस यंत्रणा कामाला लागली व इतर तपासातूनहि ज्याच्यावर संशय होताच त्या गुन्हेगाराला त्यानी त्याच्या गावातून पकडून आणले. सर्व साक्षीपुराव्याची जुळवाजुळव झाल्यावर त्याच्यावर कोर्टात खटला उभा राहिला. तेथे काय झाले ते पुढच्या भागात पहा.

Sunday, June 15, 2008

गुंतता हृदय हे - भाग १


’सोबती’च्या दि. २८ मे २००८ च्या सभेत श्री. जयंत खरे यानी सांगितलेली एक अद्भुतात मोडणारी पण सत्य कथा वाचनीय आहे. ’न्याय अंतरीचा’ या ऍडव्होकेट अंजली ठाकूर यांच्या पुस्तकात ’गुंतता हृदय हे’ या नावाने ही कथा छापलेली आहे. श्री. खरे यानी पुस्तकातील पूर्ण कथा सांगितली ती मी थोडक्यात येथे देणार आहे.
एका मानसी नावाच्या लहान वयाच्या मुलीला बालपणापासून हृदयाचा काही विकार होता व तपासण्या, उपचारांनंतर, हृदयरोपणाशिवाय दुसरा इलाज नाही या निर्णयाला डॉक्टर आले. पालक हवालदिल झाले व योग्य हृदय मिळण्याची वाट पाहत राहिले. अचानक हॉस्पिटल मधून कॉल आला की एका, जवळपास समवयीन, मृत मुलीचे हृदय जुळते आहे तेव्हा तुमच्या मुलीला घेऊन या. त्याप्रमाणे हृदयरोपण करण्यात आले व नशिबाने ते पूर्णपणे यशस्वी झाले. मुलीला नवजीवन मिळाले या आनंदात पालक घरी गेले. हळूहळू तिची प्रकृति सुधारू लागली. मात्र दुसराच एक त्रास लवकरच सुरू झाला. मानसीला टी.व्ही. समोर एकटी सोडून पालक खोलीबाहेर जाऊ लागले की लगेच ती किंचाळू लागे ’मला एकटी सोडू नका, तो येईल, मला मारेल.’ आईवडिलाना कळेना हा काय प्रकार आहे. मुलीला झाले तरी काय? शेवटी मानसोपचार तज्ञाकडे जाणे प्राप्त झाले. बर्‍याच तपासण्या करूनहि त्यालाहि काही उलगडा पडेना. हा आईवडिलांचे लक्ष आपल्यावर गुंतवून ठेवण्याचा प्रकार असावा ही प्रथमची कल्पना पण खरी दिसेना. उपचारांनी सुधारणाहि होईना. मुलीच्या आयुष्यात आलेली नवीन घटना म्हणजे फक्त हृदयरोपण झाले होते. त्याचाच काही संबंध असावा असा डॉक्टरला संशय येऊ लागला. शेवटी स्वस्थ न बसता त्यानी ज्या हॉस्पिटलमध्ये हृदयरोपण झाले होते तेथे संपर्क साधला. प्रथम हृदयदाता व्यक्ति कोण याबद्दल माहिती देण्याचे त्या डॉक्टरांनी साफ नाकारले. तसे करण्यावर कायद्यानेच बंधने आहेत त्यामुळे त्यांचा नाइलाज होता. अखेर मानसोपचारतज्ञाने सर्व हकीगत सांगून पुन्हा विनंति केल्यावर माहिती मिळाली कीं दात्री मुलगी ही घरात टी.व्ही. पहात एकटीच बसलेली असताना अचानक खिडकीतून आलेल्या चोराबरोबर तिची झटापट झाली व अखेर चोराने तिला गोळ्या घातल्या त्या तिच्या पायांना लागून ती गंभीर जखमी झाली. चोर मिळाली ती लूट घेऊन पळाला व आईबापाना घरी आल्यावर ती मुलगी जखमी अवस्थेत दिसल्यावर त्यानी तिला हॉस्पिटलमध्ये नेले. प्रयत्न करूनहि तिला वाचवता आले नाही. स्वत:वरचा आघात बाजूला ठेवून आईवडिलानी मोठ्या मनाने हृदय व नेत्रदान करण्यास संमति दिली. त्याप्रमाणे तुमच्या मुलीला तिच्या हृदयाचे रोपण केले गेले. हे ऐकल्यावर मानसोपचार तज्ञाची खात्री झाली की मानसीला होणार्‍या भासांचे हेच कारण आहे. मृत झालेल्या मुलीची झालेल्या भीषण घटनेची स्मृति मानसीकडे कशी आली याचा काही उलगडा होत नव्हता मात्र स्मृति पूर्ण खुलासेवार होती! यानंतर या कथेला वेगळेच वळण लागले. ते पुढील भागात पाहूं.

Monday, June 09, 2008

'सोबती'चा वरधापन दिन - ९ जून २००८







’सोबती’ची स्थापना ९ जून १९७९ ला झाली. या वर्षी सोबतीला २९ वर्षे पुरी झाली. ९ जून २००८ला सोबतीचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. त्याचा हा संक्षिप्त वृत्तांत.
पार्ले येथील लोकमान्य सेवा संघाच्या पु. ल. देशपांडे सभागृहात संध्याकाळी ४-०० पासून हा कार्यक्रम सुरू झाला. सभासदानी स्वत: रचलेले व चाल लावलेले स्वागतगीत म्हटले. कार्याध्यक्ष श्री. मधुकर देसाई यानी पेटीची साथ केली. श्री. विश्वास डोंगरे यानी कार्य्क्रमाचे सूत्रसंचालन केले. माजी मंत्री श्री. राम नाइक हे प्रमुख पाहुणे व सोबतीचे पदाधिकारी स्टेजवर उपस्थित होते. ’सोबती’ अध्यक्ष श्री. पेठे यानी छोटे प्रास्ताविक केल्यानंतर कोषाध्यक्ष श्री. जोग यानी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यवाह श्रीमती सुनीता कुलकर्णी यानी गतवर्षीच्या सोबतीच्या कार्याचा आढावा घेतला. ज्येष्ठ नागरिकांच्या शिखर संघटनेने ’सोबती’चा या वर्षी उत्कृष्ठ संघटना म्हणून निवड केल्याचा त्यानी विशेष उल्लेख केला. ’सोबती’च्या कार्यालयासाठी जागा मिळवण्यासाठी चालवलेल्या खटपटीला जागांच्या वाढत्या किमतींमुळे अद्याप यश मिळालेले नाही त्यामुळे आणखी देणग्या मिळवण्याची आवश्यकता व्यक्त केली. सोबतीच्या वर्षभरातील कार्यक्रमांचा उल्लेख केला.
कार्यवाह श्री. देशपांडे यानी सभासदांकडून आलेल्या पत्रांचे वाचन केले.
’सोबती’च्या रिवाजाप्रमाणे यानंतर गेल्या वर्षभरात वयाची ८० वर्षे पूर्ण केलेल्या, ७५ वर्षे पूर्ण केलेल्या व वैवाहिक जीवनाचीं ५० वर्षे पूर्ण केलेल्या सभासदांचा (जोडीने) सत्कार प्रमुख पाहुण्यांचे हस्ते पुष्पगुच्छ, श्रीफल व भेटवस्तू देऊन करण्यात आला. त्याच्या छायाचित्रांचा स्लाइड्शो शेजारच्या स्तंभामध्ये पहावयास मिळेल. श्री. राम नाइक यांचेहि ७५वे वर्ष चालू असल्यामुळे त्यांचाहि या सोहळ्यात समावेश करण्यात आला. सत्कार झालेल्यांचे वतीने श्री. शंकर लिमये यानी स्वरचित कविता गाऊन व श्रीमती विद्या पेठे यानी छोटेसे भाषण करून आनंद व कृतज्ञता व्यक्त केली.
त्यानंतर प्रमुख पाहुणे श्री. राम नाइक यांचे भाषण झाले. ’सोबती’ ही जुनी ज्येष्ठ नागरिक संघटना असल्यामुळे ज्येष्ठांच्या समोरील प्रश्न सोडवण्यामध्ये तिने पुढाकार घ्यावा असे ते म्हणाले. विशेषेकरून त्यानी ज्येष्ठाना मेडिकल इन्शुरन्स देण्यास इन्शुरन्स कंपन्या तयार नसतात याचा उल्लेख केला व याबाबतीत राष्ट्रपातळीवर प्रयत्न आवश्य्क असल्याचे निदर्शनास आणले. ज्येष्ठानी जास्तीतजास्त काळपर्यंत कार्यरत राहाणे शरीरस्वास्थ्यासाठीहि उपयुक्त ठरते असे म्हटले.
वर्धापन दिनानिमित्त बर्‍याच सभासदांनी संस्थेला लहानमोठ्या देणग्या दिल्या. त्यांची यादी श्री. डोंगरे यानी वाचून दाखवली.
aaryaadhyaksh श्री. मधुकर देसाई यांनी आभारप्रदर्शन केले व कार्यक्रम संपला. सर्व उपस्थित सभासदांना व सन्माननीय पाहुण्यांना यानंतर अल्पोपहार देण्यात आला. सभासदांनी थोडावेळ एकमेकांशी गप्पाटप्पा करून मग घराची वाट धरली.

Monday, June 02, 2008

माझ्या लग्नाची कहाणी - भाग २

‘अहो पण झाले तरी काय?’ असे पुन्हा माझ्या वडिलानी विचारल्यावर मामानी सर्व प्रकार सांगितला.
’आम्ही निक्षून विचारल्यावर वासंती म्हणाली की मुलगा डावरा आहे. डावरी माणसे बावळट असतात, कमी बुद्धीची असतात, हेकट व तापट असतात, थोडक्यांत तीं सगळ्या बाबतीत ’डावीच’ असतात तेव्हा मला नको. आम्ही म्हटले तो डावरा आहे हे तुला काय माहीत? तेव्हा ती म्हणाली की त्याने चहाचा कप डाव्या हाताने उचलला तेव्हाच मी ओळखले. आम्हाला काही पटेना तेव्हा खरं काय ते पाहण्यासाठी मी तुमच्याकडे आलो. तेव्हा हा जेवत होता, चांगला उजव्या हाताने! मी आनंदलो. वासंतीचा उगाच गैरसमज झाला असे मनाशी म्हटले. त्याला उगाचच दोन पत्ते विचारले. मात्र त्याने ते माझ्या डायरीत डाव्या हातानेच लिहिले! म्हणजे वासंतीचे निरीक्षण चुकीचे नव्हते! मी परत गेलो.
मग दोन दिवस मी व तिच्या वडिलांनी तिला समजावले. वडिलांनी पुष्कळ उदाहरणे देऊन डावरी माणसे उलट खूप हुशार, मनमिळाऊ व मेहेनती असतात असे म्हटले. अब्राहॅम लिंकन, इंग्लंडची राणी एलिझाबेथ डावरींच आहेत. डावर्‍यांच अक्षर खूप चांगलं असतं, याचंहि आहे. क्रिकेटमध्ये तर डाव्या हाताने खेळणार्‍यांना खूप महत्व असते. ते मॅचेस जिंकून देतात. विनू मांकड सारखे एका हाताने बॅटिग व दुसर्‍या हाताने बोलिंग करणार्‍याचे केवढे कौतुक होते, वगैरे अनेक गोष्टी सांगितल्या. हा मुलगा अर्धा डावरा आहे. तो जेवतॊ उजव्या हाताने पण लिहितो डाव्या हाताने तेव्हा त्याच्याकडे दोघांचे गुण आहेत असं बरंच काही सांगितल्यावर तिची समजूत पटली व आता तिने मान्य केले आहे.’
माझा जीव भांड्यात पडला! अखेर आमचे लग्न झाले. अंतर्पाटाआडून ती माझ्या पायांकडे निरखून पाहात होती, बहुधा मी पायानेहि डावरा आहे की काय हे पहात असावी! आमच्या लग्नाला ४५ वर्षे झाली. ही कथा आठवून आम्ही अजूनहि हसतॊ.एकमेकाना डावरी माणसे दाखवतो. बिल क्लिंटन भारतात आला तेव्हा तोहि डावरा आहे हे मी बायकोला दाखवले व डावरेपणाची फुशारकी मारलीच.
मला माझ्या डावरेपणाचा रास्त अभिमान आहे! मात्र हल्लीच एका रिक्षावाल्याला, सकाळीच, डाव्या हाताने भाडे देऊ लागलो तर तो म्हणाला ’साहब, सुबहके बोहनीके टाइम हम बाये हाथसे पैसा नही लेंगे!’ झगडा झाला, ’दोनों हाथ मेरेहि हैं और मुझे प्यारे है, पैसा चाहे तो लेऒ नहीतॊ जाओ’ वगैरे म्हटल्यावर मुकाट्याने त्याने ’मनसेवाला दिखता है’ पुटपुटत पैसे घेतले.
माझ्या नातवंडाना मी नेहेमी अनेक गोष्टी सांगतो त्यात ही त्यांची आवडती गोष्ट आहे. ही आमच्याच लग्नाची गोष्ट आहे हे मात्र त्याना माहीत नाही. पण मला वाटते माझ्या एका हुशार नातीला तशी शंका नक्की आहे! माझा डावरेपणा तिला ठाऊकच आहे कारण तिला फटका देताना माझा डावा हातच पुढे येतो!
’सोबती’मध्ये कथा ऐकल्यावर मी श्री. फडणीस यांचेकडे कथा लिहून मागण्यासाठी फोन केला. फोन श्रीमती फडणीसांनी घेतला. कथा लिहून द्यायला सांगते म्हणाल्या. मी विचारले ’कथा ’सोबती’च्या ब्लॉगवर लिहायला तुमची हरकत नाहीना?’ त्या हसल्या आणि म्हणाल्या ’खुशाल लिहा पण चहाचा कप उचलताना पाहून हे डावरे आहेत हे मी ओळखले एवढाच कथाभाग खरा आहे बाकी सर्व यांचीच रचना आहे.’
मी म्हटले वा फारच छान.

माझ्या लग्नाची कहाणी - भाग १

’सोबती’च्या दि. २८ मे च्या सभेत वाढदिवस समारंभात सोबती सभासद श्री. मधुकर राजाराम फडणीस यानी आपल्या लग्नाची मजेदार कहाणी सांगितली. ती जवळपास त्यांच्याच शब्दात ऐका.
रोज रात्री झोपताना आयुष्यातील आनंदी घटना आठवण्याची माझी सवय आहे. त्यात माझ्या लग्नाची आठवण नेहमीच येते. त्याचे असे झाले. माझे शिक्षण पुरे होऊन नोकरी सुरू झाली व लग्नाचे वय झालेच होते तेव्हा रीतीप्रमाणे माझ्यासाठी वधूसंशोधन सुरू झाले. बर्‍याच मुली पाहून झाल्या पण काही जमत नव्हते. शेवटी एका मुलीच्या मामाच्या मध्यस्थीने ती मुलगी पाहिली. ते मामा मला ओळखणारे, माझे व मुलीचे वडील एका शाळेत शिकलेले, तेव्हा जमायला तशी हरकत नव्हती. रिवाजाप्रमाणे आम्ही चार-पाच जण मुलगी पहावयास गेलो. कांदेपोहे खाऊन झाले व मुलीने चहाचे कप आणले. स्मितहास्य करीत तिने सर्वांसमोर ट्रे फिरवला. माझ्यापुढे धरताना हळूच हसून पाहून घेतले. नजरा एकमेकांना भिडल्या. मी कप उचलला मात्र, अन ती चपापून मागे सरली! काय झाले मला कळेना. मी जरासा भांबावलो.
आम्ही घरी आलो. दोनतीन दिवस मामांचाही पत्ता नाही. मी जरासा बेचैन होतो. तिसर्‍या दिवशी ते मामा आले पण न हसता-बोलता मी जेवत होतो तेथेच माझ्यापुढे बसून गंभीरपणे पाहत राहिले. जेवणानंतर त्यानी माझ्याकडे दोनतीन माणसांची चौकशी करून त्यांचे पत्ते विचारले, ते मी त्यांच्या डायरीत लिहून दिले. लग्नाबद्दल अवाक्षरहि न बोलता ते निघून गेले. मला काही कळेना!
परत दोन दिवसानी मामा आले ते हसतच व लग्न पक्के झाल्याचे सांगत! मधल्या चार-पाच दिवसात झालेले रामायण त्यानी आम्हाला सांगितले ते असे –
तुम्ही मुलगी पाहून गेल्यावर वासंती ( माहेरचे नाव) खूप अपसेट होती. दोन दिवस बेचैन होती. कुणाशी बोलत नव्हती. आम्ही विचारले की मुलगा तुला पसंत नाही का? तर त्यावरही ती काही स्पष्ट बोलेना! अगदी खनपटीलाच बसल्यावर तिने मौन सोडले व तिने जे सांगितले त्यासाठीच मी दोन दिवसांपूर्वी तुमच्याकडे येऊन गेलो. त्यानंतर मी तिला भेटल्यावर मात्र सर्व उलगडा झाला व आता लग्न पक्के!
ते अजूनहि जास्त काही सांगेनात त्यामुळे अडचण काय होती व कशी दूर झाली आम्हाला कळेना. मी म्हटले, चला पसंती आहेना? कळेल पुढेमागे काय झाले होते! काय घाई आहे?
असे झाले तरी काय होते? त्यासाठी कथेचा पुढील भाग वाचा!