Monday, June 02, 2008

माझ्या लग्नाची कहाणी - भाग १

’सोबती’च्या दि. २८ मे च्या सभेत वाढदिवस समारंभात सोबती सभासद श्री. मधुकर राजाराम फडणीस यानी आपल्या लग्नाची मजेदार कहाणी सांगितली. ती जवळपास त्यांच्याच शब्दात ऐका.
रोज रात्री झोपताना आयुष्यातील आनंदी घटना आठवण्याची माझी सवय आहे. त्यात माझ्या लग्नाची आठवण नेहमीच येते. त्याचे असे झाले. माझे शिक्षण पुरे होऊन नोकरी सुरू झाली व लग्नाचे वय झालेच होते तेव्हा रीतीप्रमाणे माझ्यासाठी वधूसंशोधन सुरू झाले. बर्‍याच मुली पाहून झाल्या पण काही जमत नव्हते. शेवटी एका मुलीच्या मामाच्या मध्यस्थीने ती मुलगी पाहिली. ते मामा मला ओळखणारे, माझे व मुलीचे वडील एका शाळेत शिकलेले, तेव्हा जमायला तशी हरकत नव्हती. रिवाजाप्रमाणे आम्ही चार-पाच जण मुलगी पहावयास गेलो. कांदेपोहे खाऊन झाले व मुलीने चहाचे कप आणले. स्मितहास्य करीत तिने सर्वांसमोर ट्रे फिरवला. माझ्यापुढे धरताना हळूच हसून पाहून घेतले. नजरा एकमेकांना भिडल्या. मी कप उचलला मात्र, अन ती चपापून मागे सरली! काय झाले मला कळेना. मी जरासा भांबावलो.
आम्ही घरी आलो. दोनतीन दिवस मामांचाही पत्ता नाही. मी जरासा बेचैन होतो. तिसर्‍या दिवशी ते मामा आले पण न हसता-बोलता मी जेवत होतो तेथेच माझ्यापुढे बसून गंभीरपणे पाहत राहिले. जेवणानंतर त्यानी माझ्याकडे दोनतीन माणसांची चौकशी करून त्यांचे पत्ते विचारले, ते मी त्यांच्या डायरीत लिहून दिले. लग्नाबद्दल अवाक्षरहि न बोलता ते निघून गेले. मला काही कळेना!
परत दोन दिवसानी मामा आले ते हसतच व लग्न पक्के झाल्याचे सांगत! मधल्या चार-पाच दिवसात झालेले रामायण त्यानी आम्हाला सांगितले ते असे –
तुम्ही मुलगी पाहून गेल्यावर वासंती ( माहेरचे नाव) खूप अपसेट होती. दोन दिवस बेचैन होती. कुणाशी बोलत नव्हती. आम्ही विचारले की मुलगा तुला पसंत नाही का? तर त्यावरही ती काही स्पष्ट बोलेना! अगदी खनपटीलाच बसल्यावर तिने मौन सोडले व तिने जे सांगितले त्यासाठीच मी दोन दिवसांपूर्वी तुमच्याकडे येऊन गेलो. त्यानंतर मी तिला भेटल्यावर मात्र सर्व उलगडा झाला व आता लग्न पक्के!
ते अजूनहि जास्त काही सांगेनात त्यामुळे अडचण काय होती व कशी दूर झाली आम्हाला कळेना. मी म्हटले, चला पसंती आहेना? कळेल पुढेमागे काय झाले होते! काय घाई आहे?
असे झाले तरी काय होते? त्यासाठी कथेचा पुढील भाग वाचा!

No comments: