Saturday, May 22, 2010

मराठी ब्लॉगर्स मेळावा




अलिकडे मराठी ब्लॉगर्सची संख्या झपाट्याने वाढत आहे. मराठी भाषेच्या दृष्टीने हे सुचिन्हच म्हणावे लागेल.

ब्लॉगर्सची वाढती संख्या व त्यावर लिखाण करणार्‍या ब्लॉगधारकानी एकत्र यावे या उद्देशाने काही महिन्यांपूर्वी पुणे येथे एक मेळावा आयोजित केला गेला होता. त्याला मिळालेला प्रतिसाद पाहून कांचन कराई, रोहन चौधरी आणि महेन्द्र कुलकर्णी या ब्लॉगधारकानी मुंबई येथे असा मेळावा घेण्याची कल्पना मांडली व मराठी ब्लॉगधारकाना त्यासंबंधी आवाहन केले. त्याला उतम प्रतिसाद मिळाला.

रविवार दि. ९ मे रोजी दादर येठील दादर सार्वजनिक वाचनालयाच्या हॉलमध्ये हा मेळाव्वा संपन्न झाला. ८० च्या वर ब्लॉगधारक उपस्थित होते. त्यांत अनेक ब्लॉग चालविणार्‍या निवृत्त सनदी अधिकारी श्रीमती लीना मेहेंदळे ह्याही होत्या. सोबतीतर्फे श्री. म.ना. काळे. श्री. विश्वास डोंगरे व श्री. चंद्रकांत पतके उपस्थित होते. प्रत्येक ब्लॉगधारकाने आपण कशा तर्‍हेने ब्लॉगवर लिखाण करतो याची माहिती दिली व आपली मते व्यक्त केली. सोबतीतर्फे श्री. म.ना. काळे यानी सोबतीच्या ब्लॉगची पार्श्वभूमी, त्यावरील लिखाणाचे स्वरूप यासंबंधी माहिती दिली व मराठी ब्लॉगधारकांमध्ये संवाद निर्माण होईल अशी आशा व्यक्त केली. एकंदरीत ब्लॉगधारकांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. या मेळाव्यातून ब्लॉगधारकाना बरीच नवीन माहिती मिळाली.

राजा शिवाजी डॉट कॉम या वेबसाईटचे संचालक श्री.मिलिंद वेर्लेकर यानी सांगितले की शिवाजी महाराज यांच्या व्यक्तित्वावर व कारकीर्दीवर वीस हजार पानांचे लिखाण पूर्ण झाले असून येत्या वर्षभरात ही वेबसाईत कार्यान्वित होईल व शिवरायाच्या कारकिर्दीवर व त्यांच्या व्यक्तित्वावर संपूर्ण प्रकाश पडेल व अनेक अज्ञात प्रसंग, व्यक्ती व हकिगती लोकाना ज्ञात होतील.

‘स्टार माझा’चे श्री. प्रसन्न जोशी यानी सांगितले की न्लॉगधारकानी अनेक नवनवीन विषय हाताळावेत व दुसर्‍या भाषांमधील वाड.मयही मराठीत आणण्याचा प्रयत्न करावा.

आयोजकानी मेळाव्याचे आयोजन व्यवस्थित केले होते. अल्पोपहाराची व्यवस्था केली होती. त्यांच्या प्रयत्नाने मेळाव्याला प्रायोजक मिळाल्याने कुणावर आर्थिक बोजाहि पडला नाही.

हा मेळावा यशस्वी करण्यासाठी कांचन कराई, रोहन चौधरी व महेन्द्र कुलकर्णी यानी अविश्रांत परिश्रम घेतले. यासाठी त्याना मनःपूर्वक धन्यवाद.

1 comment:

कृष्यणकुमार प्रधान said...

सदर मेळाव्यास मी सुद्धा उपस्थित होतो खूप अधी पोचल्याने माझी संयोजकांशी चांगली ओळख झाली.,माज्या भाषणात मे सांगितले की ७४ व्या वर्षी संगणक चालवायला शिकून मी ’पार्ले आजोबा’,मुम्बै पोएट्स, असे ब्लॊग चालो केले,हल्ली
भाषाभारती नावाचा ब्लॊग चालवतो.त्यानंतर लीना
मेहेन्दळे यांनी त्यांच्या भाषणात माझे कॊतुक केले
मी सोबतीचा सभासद असून सोबतीच्या ह्या अहवालात
माझा उल्लेख झाला नाही म्हणून हा शेरा.कृष्णकुमार प्रधान